सध्या धकाधकीच्या जीवनात गरजेच्या बऱ्याच कामांसाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे अशा कामांसाठी मिळतो तो सुट्टीचा दिवस म्हणजे अर्थातच 'रविवार'. याच दिवसावर आपण घरातील अनेक राहिलेली कामे ढकलतो. मात्र ठरविलेले एक असते आणि वेगळीच कामे करू लागतो. जसे की, कपाट आवरायला घेतल्यावर मधेच एखादा जुना अल्बम खुणावतो. टीव्हीवरील गाणे ऐकण्यात कसा वेळ जातो हे देखील समजत नाही. बघता बघता अर्धा दिवस कसा सरतो हेच कळत नाही. साहजिकच जेवणाच्यावेळी नाष्टा केला जातो. खाल्ल्यानंतर जरा निवांत पडावे वाटते आणि कामे तशीच पडून राहतात आणि मग चिडचिड सुरू होते.
दरदिवस शरीराला धावपळीची सवय असल्यामुळे सुट्टी असलेल्या आनंदावर पाणी फिरते. पण दररोज धावपळ करणे हे काही जीवन नाही. खरंतर आपण सुट्टी उत्तमप्रकारे व्यतीत केलेली असते. त्यात काहीतरी नावीन्य असते. पण याकडे सरळ दुर्लक्ष करून उरलेल्या सुट्टीच्या आनंदात विरजण घालतो. याउलट त्यातून मनाला आनंद मिळाला. शरीराला थोडासा आराम मिळाला. एखाद्या दिवशी कामे वेळेच्या वेळी नाही झाली तर काय फरक पडतो? आपण माणसे आहोत यंत्र नाही. त्यामुळे फक्त काम आणि काम म्हणजेच जीवन नाही. आपल्या आवडत्या ठिकाणी फिरायला जाणे, आवडत्या व्यक्तींशी गप्पा मारणे, आवडत्या वस्तूंवर ताव मारणे. या गोष्टींनाही महत्व दिले तर निश्चितच आपले अनमोल जीवन जगण्याचा आनंद द्विगुणित होईल.
रविवारची सुट्टी म्हणजे रोजच्या कामातून येणारा कंटाळा घालवण्यासाठी आणि पुन्हा नव्याने , नव्या स्फुर्तीने कामासाठी ताजेतवाने होण्यासाठी मिळालेला हक्काचा दिवस !
ReplyDelete