Monday, 15 January 2018

रॅंडम विचारांची कंडम साखळी....(अभिषेक राऊत)

      आज तसं बऱ्याच दिवसांनी पेन हातात घेतलंय. काय लिहावं याबद्दल काहीही कल्पना नाही. जितका कोरा कागद तितकंच मनही कोरं. विषय,विचार मनात येतच नाहीयेत. विचारांविना शब्दांनाही फारशी ताकद नाही. अधिक सामर्थ्यवान कोण? विचार की शब्द असले प्रश्न मनात घुटमळत राहतात. विचारच सामर्थ्यवान. शब्द तर केवळ एक माध्यम, विचारांना व्यक्त करण्याचं. खरंतर आम्ही खेळायला हवेत विचारांचे खेळ. पण बऱ्याचदा आम्ही शब्दांचेच खेळ खेळतो आणि त्यातच गुरफटून राहतो.
      सामर्थ्यवान कोण हा अख्या  मानवजातीचा आवडता प्रश्न. ह्याचं उत्तर शोधण्यासाठी केले गेलेले प्रयत्न म्हणजेच मानवजातीचा इतिहास आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अर्थातच जे सामर्थ्यवान ठरतात तेच इतिहास लिहितात आणि त्यांना मानवेल असाच लिहितात. म्हणून मग सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावूनही राम पूज्यनीय ठरतो आणि बघताबघता रावण खलनायक ठरवला जातो. इतिहास लिहिताना तेवढी काळजी प्रत्येक विजेता घेतोच मग तो भारतातला असूदे किंवा परदेशातला.
                     
        पण भारतासारख्या भावनाप्रधान देशात इतिहास लागतोच कारण तो आम्हाला महापुरुष पुरवतो. या महापुरुषांत राम, कृष्ण , शिवाजी , महाराणा प्रताप , ते गांधी , नेहरू , आंबेडकर असे सगळे येतात. महापुरुषांच काय करायचं हे आम्ही फार आधीच ठरवलंय. आम्ही शक्यतो त्यांचे पुतळे बांधतो. विमानतळ, रेल्वे स्थानक यांना त्यांची नावं देतो, शक्य झाल्यास त्यांच्या नावाने आम्ही काही योजना घोषित करतो, त्यांच्या नावाने आम्ही मतं मागतो , त्यांच्या नावाचे पुरस्कार देतो, त्यांच्या स्मारकासाठी समुद्रात , बेटांवर , मिलमध्ये जागा देतो, देवघरात त्यांचे फोटो ठेवतो , वर्षातून दोन जयंत्या , पुण्यतिथ्या साजऱ्या करतो आणि सगळ्यात महत्त्वाचे असे जे त्यांचे विचार त्यांना सोयीनुसार आपल्या शब्दांत मांडून आपल्या भविष्याची सोय करून ठेवतो. शक्यतो आम्ही महापुरुष वाटून घेतो. हा आमचा तो तुमचा असं. मग या महापुरुषांच्या विचारांवर चर्चा, मतभेद, वाद-विवाद होण्यापेक्षा त्यांच्या अनुयायांमध्ये मारामारी होणं जास्त सोयीस्कर असतं.
           पूर्वी महापुरुष होणं जरा कठीण होतं. पण आजकाल ते सोप्पं झालंय. अनुयायी आजकाल भाड्यानेही मिळतात. विचार सामर्थ्यवान असतात पण आजच्या धावपळीच्या युगात विचार करण्यासाठी कुणाकडे फारसा वेळ नसतोच. त्यापेक्षा तोडफोड आणि मारामारी करून जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं. शिवाय आजकाल मीडियासुद्धा सगळीकडे हजार असतो. त्यांच्या लेखी ‘NEWS value ” ला महत्त्व असतं . तात्त्विक विरोधापेक्षा चार बसेस जाळल्यात तर त्याची “NEWS value” साहजिकच जास्त असते. त्याला जास्त प्रसिद्धी मिळते . जर तुमच्या शहरात, गावात तुम्ही बसेस जाळू शकत असलात आणि कामकाज बंद पाडू शकत असलात तर तुमची ‘वट ‘ वाढते . तुम्हाला लोक आधी ‘दादा’ , मग ‘साहेब’ आणि मग ‘सरकार’ बोलू लागतात. तुमच्याही नकळत तुम्ही ‘सामर्थ्यवान’ होऊ लागता. कारण शेवटी ‘सामर्थ्यवान कोण’ हाच प्रश्न असतो. कुठल्याही विषयाविना गुंफलेली ही रॅंडम विचारांची कंडम साखळी पुन्हा सुरुवातीलाच येऊन थांबते.








-अभिषेक राऊत.

Friday, 12 January 2018

आठवण....( अमोल अवचिते )

   
    सोडून जाताना एकदा तरी सांगायचं होतस...
    काही व्यक्ती अशा असतात की त्यांची साधी आठवण आली तरी स्तब्ध व्हायला होत.कधी त्या व्यक्तीच्या आठवणीत रमायला होत कळतही नाही.
   अशाच प्रेमळ व्यक्ती आपल्याला त्यांचा लळा लावून जातात. काही वेळेस आठवणीत रमून गेल की नकळत डोळ्यातुन पाणी ही येत...कधी अश्रू व्हायला लागतात समजतच नाही.. जुने फोटो पाहावे तरी काळजात धस्स होत..कारण नुसते फोटो पाहिले तरी मन व्याकुळ होत...
        अशी ती माझा आयुष्यात येऊन  मला भावनिक व्हायला शिकवून गेली . दुसरं कोणी कितीही लांबच असो की जवळच आपण मात्र नेहमी हसत राहायला हवं ...असच ती नेहमी सांगत असायची. मी तसा तिच्या जवळचा होतोच ..आई सारखी माया द्यायला ती कधीच कमी पडली नाही..कधी रागवलीही नाही. ज्या ज्या वेळी मी समोर असेल त्या वेळी तिचा आनंदच वेगळा असायचा ..हो तो आनंद आजही  जशाचा तसा माझा समोर उभा राहिलाय. तो  माझ्याकडे पाहून आता हसतोय बहुतेक ....का तर आता तो तिच्या सोबत निघून गेलाय ना...म्हणून कदाचित तो खुश असावा...मला मात्र हसून हिनावतो आहे..
           कधी कधी वाटत का गेली असेल ती मला सोडून ..?का तिचं प्रेम नव्हते का माझ्यावर ..?? ती गेली त्या दिवशी किंवा त्या आदी मी तिच्याशी कधी बोललो हे सुद्धा लक्षात
नव्हते...अस का झालं असावं..का ती जाणार होती म्हणून मला ती भेटली नव्हती...हो हे खरं असेल कदाचित कारण मी तिला जाऊच दिल नसतं ना....आमचं ठरलं होतं,की आयुष्यभर सोबत राहायचं...म्हातारी झाल्यावर माझाच आधार होता तिला....
         किती स्वप्न अधुरे सोडून गेलीस ग तू ?? मला अधिकारी होताना पहायचं होत ना तुला..?? मी कसा साहेब म्हणून मिरवून घेईल हेही पहायचं होत ना ..?? न सांगता गेलीस याच दुःख आहेच ..! पण कधी कधी वाटत की गेलीस ते बर ही झालं ..कारण तू गेल्यानंतर तुझी किंमत मला तर माहीत होतीच पण ती बाकीच्या लोकांना ही समजली...तुला होणारा त्रास मला कधीच मान्य नव्हता.मात्र होणारा त्रास कधीच कमी करता आला नाही याचं दुःख कायम मनात राहिलं आहे.
           
                 
               ज्या दिवशी तुझा अपघात झाल्याची बातमी ऐकली त्या वेळी खरं तर रागच आला होता मला...का गेली होतीस रोडला?? तुला गाड्या बघून  रस्ता ओलांडता येत नाही माहीत  होत ना  मग तरी सुद्धा गेलीस ...म्हणून याची शिक्षा तुला व्हायला हवी असच मला वाटलं...म्हणून मी ही निवांत राहीलो.. गादीवर आडवा पडून टीव्ही पाहण्यात मी रमलो होतो ..त्यावेळी का वाटलं नसेल की तुला अपघात झालाय त्यात तुला खरंच लागले असेल  का?? कोणत्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलेत याची साधी चौकशी सुध्दा केली नाही मी. जेवण करून झोपताना एक फोन केला तेवढा सोनीला, की कुठे घेवून गेलीस तिला म्हणून आहे का जिवंत अस फक्त नेहमी प्रमाणे रागात बोललो ..पण यावेळी  तु जीवंत नाहीस अस सोनी बोलली ग...न मी हसून ही बोललो कि बरं  झालं असच पाहिजे तिला...सर्वांची काळजी करते. पण स्वतःची काळजी घ्यायची म्हटले की नको वाटत तिला.....सोनी मात्र शांतपणे ऐकत होती ...माझं बोलणं संपण्याची वाटच बघत होती....माझं बोलणं संपते ना संपते तेच ती बोलली डॉक्टर  बोललेत  की सकाळी तुम्हांला डेड बॉडी मिळेल ..उद्याच अंत्यसंस्कार करावे  लागतील ...अस सांगताच मी हसलो  मात्र त्याच वेळी जोराचा हंबरडा सोनी नी फोडला अमोल खरंच रे आपली काकू आपल्याला सोडून गेली.    
           डॉक्टर बोलले, आणायला थोडा उशीर झाला नाही तर तुमचे पेशंट वाचले असते.. याला दोषी तूच होतीच असच वाटलं मला कारण तू दिवसभर शेतातून काम करून आली होतीस,दिवसभर उपाशी होतिस तुला घरात बसता येत नव्हत का ??.पण गरिबी पुढे आरामला कुठे जागा असते?? घरातील पीठ संपले होते म्हणून तू दळण आणायला गेली होतीस हे नंतर समजले... रात्रीही उपाशी झोपली असतीस तर बिघडले कुठे असते...?? असच मनाला कुठे तरी वाटत राहतं.. पण तुला सांगायचं राहवून गेलं की तू जाण्याला मीच जबाबदार आहे. तुला रिक्षाने धडक दिली याची पहिली बातमी मलाच समजली होती .मी मात्र तुलाच दोष देत बसलो....मला माफ कर मी तुला वाचवू शकलो नाही..अजूनही तू दिलेला मायेच्या ठेवा मी जपून ठेवला आहे.


5






             -  अमोल अवचिते
             (कार्याध्यक्ष -रयत
                           फाउंडेशन)

ऊर्जा वास्तुतील सकारात्मकतेची....(ऋतुजा हगवणे)


  आजच्या जगात जगण्यासाठी पैसा, घर आणि अजून काही उपभोग वस्तुंची आवश्यकता असते. पण यापलीकडे आज एका गोष्टीची नितांत गरज आहे ती म्हणजे 'सकारत्मक्ता'. मग ही सकारात्मक्ता पुस्तकातून, व्यक्तितून, अनुभावातून तर  काही काही वास्तू यांमधुन येत असते आणि त्यात जर त्या पुण्यातील असतील तर  "क्या बात..... नाही का..."
           फर्ग्युसन कॉलेज मधील किमयाचा कट्टा, रानडे च्या दगडी भिंती, गुडलक आणि जे एम रोड, fc रोड , हि ठिकाण नेहमीच मला positivity देतात...  खुप मोठमोठया लोकांचा वावर या ठिकाणी झालाय.  त्यामुळेच की काय माहित नाही...पण मला खूप आवडतं येथे ...रमता येत येथे..... विचार करता येतो...स्वतःला अनुभवता येत...

                          -ऋतुजा हगवणे, रानडे इंस्टिट्यूट.

-------------------------------------------------------------------

राष्ट्रिय युवा दिन......(स्वामी विवेकानंद जयंती विशेष)

    
           "उठा ,जागे व्हा आणि ध्येय प्राप्त  होत नाही तोपर्यंत थांबू नका...."असा संदेश देणारे युवकांचे प्रेरणास्रोत व समाजसुधारक स्वामी विवेकानंद यांचा आज जन्मदिवस. या महापुरुषाचा जन्मदिवस आपण राष्ट्रिय युवा दिवस म्हणून साजरा करतो. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ. स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी१८६३ रोजी कोलकात्यात झाला.
   या महान पुरुषाने सुप्त अवस्थेत असल्याला समाजाला नवी ऊर्जा , दिशा,साहस देण्याचे काम केले. त्यांच्या ओजस्वी वाणीने भारतात व भारताबाहेर अनेक लोकांना मोहित केले. कोणत्याही देशाची खरी ताकद ही त्यांच्या देशाचे युवक असतात, हे त्यांनी नेहमी पटवून दिले. त्यांच्या विचारांनी युवाशक्ती ही नेहमी बोध घेत राहिली. 
     अमेरिकेत `भगिनींनो आणि बंधूंनो’ या शब्दांनी सार्‍या मानवजातीला साद घलणारे स्वामी विवेकानंद एकमेव वक्‍ते होते. त्यांनी त्यावेळी सांगितलेले विचार हे आज सुद्धा तेवढेच काल सुसंगत वाटतात. आयुष्यभर सकारात्मक विचारांची पेरणी केलेल्या या महापुरुषाला विनम्र अभिवादन..!
                                      
-------------------------------------------------------------------

Tuesday, 9 January 2018

६० मीटर धावण्याच्या स्पर्धेत महाराष्ट्राची समीक्षा प्रथम


      पुणे प्रतिनिधी:-स्टुडंट ऑलम्पिक असोसिएशन च्या वतीने राजीव गांधी स्टेडियम मध्ये आयोजित केल्या गेलेल्या स्टुडंट ऑलम्पिक नॅशनल चॅम्पियनशिप चा शुभारंभ झाला. यामध्ये देशभरातील विविध राज्यांमधील शाळा व महाविद्यालयातील विध्यर्थ्यांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच सहभागी खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केले.
        शुक्रवारी पहिल्या दिवशी एथलेटिक्स स्पर्धेच्या अंडर-१० या वयोगटातील ६० मीटर धावण्याच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या समीक्षा हिने १०.८७  सेकंदाने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच अंडर-१२ या वयोगटातील १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरियाणाच्या प्रियाने प्रथम तर समीक्षा ने दुसरा क्रमांक पटकावला. या ऑलम्पिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी देशभरातून तीन हजार खेळाडू सहभागी झाले आहेत.रोहतक येथे दि. 4 ते 7-1-2018 या कालावधीत या स्पर्धा झाल्या. 

Monday, 8 January 2018

छात्रभारतीचे अविस्मरणीय अधिवेशन ....(समता शिंदे, छात्रभारती,पुणे )

             
       महाराष्ट्र गेले ८-९ दिवस अनेक कारणांनी गाजतोय त्यात एल्गार परिषद, भीमा कोरेगाव ची तनावयुक्त परिस्थिती,  महाराष्ट्र बंद आणि छात्रभारतीचा पोलिसांनी हुकूमशाही पद्धतीने उधळलेला ४ तारखेचा परिसंवादाचा कार्यक्रम या सर्व घटनांची सोशियल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर मोठमोठ्या  बातम्या  झाल्या. या अधिवेशनादरम्यान आलेला माझा अनुभव ....
               गेली २-३ महिने छात्रभारतीच्या अधिवेशनाची तयारी चालली होती या वर्षीचे अधिवेशन हे ३५ वे आणि ऐतिहासिक अधिवेशन होते , या अधिवेशनाला एक वेगळेच वलय निर्माण झाले होते त्याचे असे की या अधिवेशनामध्ये   शिक्षण या प्रश्नांवर राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या विविध  विध्यार्थी नेत्यांबरोबर परिसंवाद ठेवला होता. या विद्यार्थी नेत्यांसोबत विविध प्रश्नांवर चर्चा केली जाणार होती. या परिसंवादात नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवानी, रिचा सिंग, उमर खालिद, प्रदीप नरवाल , यांसारखे अनेक राष्ट्रीय विद्यार्थी व युवा नेते सहभागी होणार होते. त्यामुळे सर्व छात्रभारतीचे सर्व कार्यकर्ते अगदी जोशाने व मेहनतीने अधिवेशनाची तयारी करीत होते. दिनांक २ जानेवारी रोजी आम्ही पुण्याहून जवळपास 40 कार्यकर्ते   अधिवेशनास निघालो ट्रेन रात्री १०:५५ ला होती उस्मानाबाद,भूम व परांड्याहुन जवळपास १८० कार्यकर्ते आम्हाला येऊन भेटणार होते. 10.55 ची ट्रेन 1 तासाने उशिरा येणार अशी सूचना आली या नंतर सर्व लोक ट्रेन ची वाट पाहत बसले याच दरम्यान  ज्येष्ठ लेखक व अभ्यासक अतुल देऊळगांवकर यांची अचानक रेल्वे स्टेशन वर भेट झाली. त्यांच्या बरोबर आजच्या सामाजिक परिस्थितीवर चर्चा केली.
           त्याचदरम्यान आमची ट्रेन आली व आम्ही सर्व ट्रेनमध्ये बसलो व सर्व कार्यकर्ते जे उस्मानाबाद ,भूम, परांड्याहुन आले होते त्यांना पुण्यातून बाबा आढावांच्या कष्टाची भाकर मधून घेतलेले झुणका भाकर सर्वांना दिली व  आमचा प्रवास सुरू झाला. ट्रेन एवढ्या गतीने चालत होती की प्रत्येक स्टेशनवर जवळपास अर्धा तास थांबत होती, रेल्वे क्रॉसिंगच तर विचारू नका , साधारणतः पुण्याहून मुंबई ला रेल्वे ने जायला ४ तास लागतात आम्हाला ९ तास म्हणजे जवळपास दुप्पट वेळ लागला. या प्रवासा दरम्यान सर्व कार्यकर्त्यांनी  चळवळीची गाणी गात आणि घोषणा करत प्रवास केला. ३ जानेवारी रोजी सकाळी ९:३० ला दादरला उतरल्यावर लोकलने गोरेगावला गेलो तिथून न्यूझीलँड हॉस्टेल वर जाऊन प्रथम फ्रेश झालो आणि त्यानंतर नाश्ता केला, त्यानंतर अधिवेशन स्थळी गेलो तिथे संपूर्ण महाराष्ट्रातुन जवळपास ३०० कार्यकर्ते आले होते सर्वांशी ओळख केली आणि चळवळीची गाणी गात आणि घोषणा देत परिसर छात्रभारतीमय केला. या दरम्यान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांच्या हस्ते अधिवेशनाचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी, आमदार कपिल पाटील, अँड.शरद कोकाटे, अजित शिंदे, छात्रभारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे, उपाध्यक्ष राकेश पवार, सागर भालेराव, मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे ,कीर्ती ,रेश्मा बोरकर, प्रांजली गुंजाळ, सारिका आखाडे आदी उपस्थित होते.
         या नंतर अँड.शरद कोकाटे , प्रज्ञाकुमार गाथाडे आणि अजित शिंदे यांनी छात्रभारतीची वाटचाल या विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आमदार कपिल पाटील यांनी छात्रभारतीचा संघर्ष या विषयावर माहिती दिली  व सरकारी शाळा वाचविण्यासाठी आपल्याला येत्या काळात मोठा लढा उभारावा लागणार आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
           दिनांक ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या राष्ट्रीय विद्यार्थी संमेलनाच्या तयारीला सर्वजण लागले. दिनांक ४ रोजी आम्ही सर्वजण जवळपास ६०० लोक कार्यक्रमाच्या ठिकाणी म्हणजेच विलेपार्ले येथील भाईदास सभागृहजवळ सकाळी ९ वाजता पोहोचलो. सर्व कार्यकर्त्यांची नाश्त्याची व्यवस्था तेथेच केली होती परंतु अचानक जवळपास 30 -35 पोलिस तिथे आले प्रथमतः आम्हाला वाटले ते कार्यक्रमाला सुरक्षा देण्यासाठी आले आहे. पण त्यांनी आम्हाला त्यांनी सभागृहात जाण्यास मज्जाव केला. आम्ही सर्वांनी रस्त्यावरच नाश्ता केला, सकाळी १०:३० मिनिटांनी आम्हाला कलम १४९ अनुसार नोटीस दिली आणि कार्यक्रमाची परवानगी नाकारत आहोत असे सांगितले. आम्ही सर्व चिडलो आणि कार्यक्रम होणारच यावर ठाम राहिलो.  आम्ही घोषणा द्यायला सुरुवात केली. पोलिसांनी विद्यार्थ्यांना घाबरविण्यासाठी माईक वरून सूचना द्यायला सुरुवात केली व विद्यार्थ्यांना परत जाण्यास सांगितले पण आम्ही आमच्या ठिकाणीच होतो, त्या दरम्यान  पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली.

       सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना त्यांनी अटक करण्यास सुरूवात केली सर्वप्रथम छात्रभारती चे अध्यक्ष दत्ता ढगे, उपाध्यक्ष राकेश पवार, सागर भालेराव, संदीप आखाडे, सचिन बनसोडे, अनिकेत घुले, ऍड अजित शिंदे, ऍड शरद कोकाटे, रशिद मानियार,लोकेश लाटे,रवि गुंजाळ, रोहित ढाले यांसह अनेक कार्यकर्त्यांना अटक केली व बाकीच्या सर्व कार्यकर्त्यांना ग्रुप ने वेगवेगळे करत धक्काबुक्की करत बाजूला नेत गेले. या दरम्यान जवळपास १०० हुन अधिक असणाऱ्या मुली घाबरून गेल्या त्या सर्वांना आम्ही धीर देण्याचा प्रयत्न आम्ही केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना रेल्वे स्टेशन वर जायला सांगितले व आपापल्या गावाला जा असे सांगितले. या दरम्यान रेश्मा आणि मी पोलीसांना सांगितले की आम्हा सर्वांना पोलिस ठाण्यात घेऊन चला मुलींना घाबरवू नका तेव्हा आम्हा सर्वांना जुहू पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले ही माझी पहिली अटक होती. या दरम्यान राकेश पवार, रशीद मनियार आमच्याशी सतत संपर्कात होते. सर्व कार्यकर्त्यांना वेगवेळ्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. जुहू पोलीस ठाण्यात गेल्यावर आम्ही तेथील परिसर घोषणा आणि गाण्यांनी दणाणून सोडला. पोलिसांनी दमनशाहीच्या माध्यमातून आमचा कार्यक्रम उधळून लावला होता याचा राग आम्हा सर्व कार्यकर्त्यांमध्ये होता.
           पोलिसांनी अगदी कार्यक्रमाच्या काही मिनिटे आधी आमच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारली याचा आम्ही निषेध करत होतो. त्यावेळी जवळपास सर्व मिडिया तिथे उपस्थित होती. आम्हा सर्व कार्यकर्त्यांना भेटायला आमदार कपिल पाटील, आमदार विद्या चव्हाण, अनिता पगारे,प्रतिभा शिंदे,अश्विनी सातव, निखिल वागळे व अनेक कार्यकर्ते आले होते. त्या दरम्यान आमदार कपिल पाटील ,रिचा सिंग , प्रदीप नरवाल यांना देखील अटक करण्यात आली. आम्हा सर्वांना सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले व सायंकाळी ५ च्या दरम्यान वरील सर्व मान्यवरांच्या प्रयत्नाने आमची सुटका करण्यात आली. अशा प्रकारे पोलिसांनी राजकीय दबावाखाली आमचा कार्यक्रम हुकूमशाहीने उधळून लावला. जवळपास दिवसभर स्थानिक, प्रादेशिक व राष्ट्रीय मीडियावर न्युज होती. या अधिवेशनदारम्यान अनेक गोष्टी शिकता आल्या अशा प्रकारे या वर्षीचे  हे अधिवेशन अविस्मरणीय ठरले.
----------------------------------------------------------------------------------------
- समता शिंदे,
छात्रभारती , पुणे.
(छात्रभारती या विद्यार्थी संघटनेचे 35 वे अधिवेशन नुकतेच मुंबईत पार पडले या दरम्यान आलेल्या अनुभवांचा हा लेख )

विवेक धांडे (Excise sub inspector)

        नाशिक जिल्ह्यातील नामपुर या छोटयाशा गावातील मुलाने एमपीएससी मध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या पदाचा निकाल नुकताच जाहीर झाला.यासाठी सप्टेंबर महिन्यात परीक्षा आयोगामार्फत  घेण्यात आली होती.एकूण ३०० पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती.
          मुळचे नाशिक जिल्ह्यातील नामपुर येथील विवेक धांडे यांनी ओबीसी प्रवर्गातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. मैकेनिकल अभियांत्रिकी मध्ये शिक्षण  घेतलेले विवेक यांना लहानपणापासून प्रशासनात येण्याची प्रचंड इच्छा होती. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो त्या भावनेतूण त्यांनी अभियांत्रिकी नंतर पुणे येथे जाऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. गेली दोन वर्षापासून त्यासाठी ते मेहनत घेत होते. नुकत्याच झालेल्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेमध्ये त्यांना थोडक्यात हुलकावनी दिली होती, परंतु त्यांनी त्याची भर आजच्या निकालाने पूर्ण केली.
      विशेष बाब म्हणजे 'एमपीएससी'च्या गतवर्षी झालेल्या सर्व पूर्व परीक्षा धांडे यांनी पादांक्रित केल्या. अजून पर्यंत दोन परिक्षांचे निकाल जाहिर झाले आहेत.
           धांडे हे एक सामान्य कुटुंबातील असून त्यांचे वडील पंडित वसंत धांडे हे उन्नती  माध्यमिक  विद्यालयात उपशिक्षक आहेत. त्यांचे लहान बंधू अक्षय धांडे  हे सुद्धा 'आयसीडब्लूए' च्या परीक्षेमध्ये मागच्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांकानेच उत्तीर्ण झाले होते. ते सध्या राजकोट येथील इंडियन ऑइल या महारत्न कंपनीत 'अकाउंट ऑफिसर' या पदावर कार्यरत आहेत. आई स्वाध्यायी विचारांशी बांधिल असल्यामुळे दोन्ही मुलांवर योग्य संस्कार त्यांनी केले. त्यामुळे आज दोन्ही मुलांना शासनामध्ये अधिकारी पदावर जाताना आई पुष्पा धांडे यांना खूप आनंद होत आहे.
          आज या एकाच कुटुंबातील दोन्ही भावांमुळे नामपुर या छोट्याशा गावाचे नाव आता प्रकाश झोता मध्ये आले आहे. आजच्या निकालामुळे गांवामध्ये आनंद व्यक्त होताना दिसत आहे.
प्रतिक्रिया:-
      " वर्षाची सुरूवात ही मागच्या वर्षी केलेल्या मेहनतीच्या फळाने झाली याचा खूप आनंद होत आहे. मागच्या महिन्यात लागलेल्या विक्रीकर निरीक्षक परिक्षेच्या निकालामध्ये सहा गुणांनी पद हुकले होते, परंतु या निकालाने त्याची भर पूर्ण केली. आता पुढील लक्ष हे येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालावर आहे. " -विवेक धांडे.


मित्रांसमवेत आनंद व्यक्त करतांनाचा एक क्षण

Wednesday, 3 January 2018

बदल हवा....बदल हवा...( ऋतुजा हगवणे )

      
      "आज मे  उपर, आसमा नीचे...... 
आज मे आगे ....जमाना हे पीछे..."  गाण्याच्या या ओळी गुणगुणत गीता खुपच खुश दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर आज फार तेज दिसत होते....  हॉस्टेल मधल्या पोरी तिच्याकडे पाहुन जरा आवाकच झाल्या होत्या. त्याला कारणही तसेच होत बरका... काही दिवसांपूर्वी आलेली गीता आणि आताच्या घडीला बदललेली गीता यात खूपच फरक होता. महिन्याभरापूर्वी गीता सोलापुरातून पुण्यामध्ये शिकण्यासाठी आली होती. अभ्यासात हुशार असणारी गीता डोळ्यात अनेक स्वप्न साठवून पुण्यात आली होती . गीताकडून घरच्यांच्या अपेक्षाही भरपूर होत्या. कॉलेजच्या पाहिल्या दिवशी गीता साधीच गेली. पण तिथलं वातावरण पाहून थोडीशी थबकलीच. छान-छान जीन्स टॉप घातलेले पोर पोरी.. त्यांचं छानसं राहणीमान.. गीता मात्र फार साधी मुलगी होती. या सगळ्यांपुढे ती स्वतःला कमी समझू लागली. गीताच्या राहणीमानामध्ये थोडासा गावाकडील टच होता.  तिच्या राहणीमानावरून अनेकदा तिच्यावर कमेंट देखील केल्या गेल्या.  
         
या सगळ्यामुळे गीताचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणावर डगमगू लागला. ती खचू लागली. आणि कशाचाच विचार न करता तिने थेट सोलापूरच गाठले. घरचे जरा गोंधळातच पडले. घरच्यांनी कॉलेज  होस्टेलची संपूर्ण फी भरली होती. त्यामुळे त्यांचा जीव आणखीनच बुचकळ्यात पडला  पुण्यावरून जाऊन आल्यावर गीताच्या वागण्यात बराच बदल झाला होता . घरच्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गीताला मानसोपचार तज्ञाकडे नेले. आधी मानसोपचार तज्ञ यांनी गीताला बोलत केलं मग हळूहळू एक एक गोष्टी उलगडू लागल्या. यावर डॉक्टरांनी गीताला कमालीचे सल्ले दिले. जगाबरोबर आपणही बदललं पाहिजे , किती दिवस जुन्या गोष्टी घेऊन बसणार ...?        
     
    छान राहून ,छान दिसणं थोडी ना वाईट आहे... तू तुझ्या राहणीमानात बदल घडव तो पण तज्ञाचा सल्ला घेऊनच ...एक छानसा हेअरकट करुन बघ , राहा एकदम मस्त पण हे अती सुद्धा होणार नाही ना याची काळजी घेणंही आवश्यक आहे. आज परफेक्ट रहाणं ,नीटनेटकं राहणं जगाची गरज आहे. आणि जग सुद्धा याच गोष्टींकडे आकृष्ट होत असं म्हणणं पण वावगं ठरणार नाही. जसा गाव तसा वेष असावाच की
       मानसोपचार तज्ज्ञांच्या सांगण्यावरून गीताने स्वतःमध्ये बदल घडवण्यास सुरुवात केली. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने तीन आपलं रुपडंच पालटलं ... छानसा व्यवस्थित तिला शोभेल असा हेअरकट, नीटनेटका ड्रेस , चेहऱ्यावर या सगळ्यामुळं आलेलं कमालीचं तेज यामुळे गीताच्या चेहऱ्यावर आता कमालीचा आत्मविश्वास दिसत होता. आता ती कॉलेज मधल्या त्या मुलामुलींसमोर स्वतःला  कमी समझत नव्हती. हा बदल केल्यामुळे निर्माण झालेल्या  आत्मविश्वासामुळे गीताची सगळ्यांशी चांगली नाती जमली. आणि गीताचा आधी असणारा हसरा, खळखळणारा स्वभाव तिच्यात पुन्हा आला.
         या उदाहरणावरून सांगायचं हेच कि जर चांगलं , नीटनेटकं राहील तर कुठे धाड भरतेय? चांगलं राहणं हा तर गुन्हा नाहीना ? हि तर काळाची गरज आहे. आणि तीच गरज ओळखून प्रत्येकाने स्वतःमध्ये बदल करणं अपेक्षितच आहे. जगाबरोबर चालायचं म्हंटल्यावर हे असं मेंगळटसारखं राहणीमान नाही म्हंटल तरी चार चौघात ओशाळवाणं वाटत. किती दिवस आपण घेऊन बसणार  जुने आजकाल कुठेही मुलाखतीसाठी जा तिथे तुमच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांपर्यंतचा नीटनेटकापणा पहिला जातो. मग का नाही दिसायचं छान ? का नाही राहायचं छान ? या सर्वांमधून जर चांगलंच साध्य होणार असेल तर आपण नक्कीच बदलले पाहिजे.


     स्वतःमधील म्हणजेच राहणीमानातील बदलही योग्य त्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच केला पाहिजे. नाहीतर करायला गेलो एक आणि झालं एक अशी नको व्हायला .... काहींना माझे हे म्हणणे पटेल किंवा पटणारही नाही . पण विचारा स्वतःच्या मनाला हा प्रश्न , काय चुकीचे आहे यात ?... नाहीना ? मग तर झालंना... बदल हवा जो आपल्याला सकारात्मकतेकडे घेऊन जाईल, जो आपल्याला आत्मविश्वास देईन .. बदल हवा जो आपल्या पंखांना बळ देईन. आपल्याला मनसोक्त गगनभरारी घेऊन देईल... म्हणूनच म्हणते बदल हवा.. बदल हवा ...... बदल हवा.... 

                                 
                                                                                                       -ऋतुजा दत्तात्रय हगवणे

Monday, 1 January 2018

छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी....( विजय ढोबळे)

        नकळतपणे एक-दोन वेळेस डोळ्याच्या पापण्यांनीं उघडझाप करावी आणि त्याचा कानोसा मनाला लागणे कठीण व्हावे तसे मागील वर्ष केव्हा पूर्ण झाले समजलेदेखील नाही. दूरवरच्या एखाद्या अनोळखी देशातील पर्वतरांगेतून प्रवास करताना आपण खिडकीबाहेर डोके काढून निसर्गाने उधळलेल्या रंगांची व त्याच्या कलाकृतीची प्रतिमा डोळ्यात साठवून ठेवण्यात एवढे गुंग होऊन जातो की आपण हजारो मैलांचा प्रवास केव्हा पार केला आहे याचेदेखील भान राहत नाही. हा प्रवास करताना खाच-खळगे, वेडीवाकडी वळणे, चढ-उतार, कच्चे रस्ते अशा अनेक समस्यांचा अनुभव देखील घेत असतो परंतु त्यांच्या परिणामांपेक्षा मन बहरून टाकणाऱ्या सौंदर्यसृष्टीचा आनंद आपल्याला जास्त असतो. प्रवासातील याच आठवणींची शिदोरी आपण नेहमी जवळ बाळगतो. अस्वस्थतेच्या काळात त्याची जास्त गरज असते. याच प्रवासामध्ये आपल्याला आयुष्यभर सोबत देतील असे सहकारीदेखील भेटतात. हा संपूर्ण प्रवास म्हणजेच आपल्या भूतकाळातील विखुरलेले क्षण जे कि आपल्याला काळोख्या रात्रीही चंदाण्यांप्रमाणे आपल्या आयुष्याची वाट उजळून टाकतात.

            भूतकाळातील गोड-कडू आठवणींचा तटस्थ राहून विचार करूयात. तडजोडी आयुष्यात सर्वचजण करतात आपण त्या मोकळ्या मनाने स्विकारुयात. अन्न, वस्त्र, निवारा व मानवी नातेसंबंध एवढ्याच प्रत्येक माणसाच्या गरजा आहेत व आनंदी आयुष्य जगण्यासाठी त्या पुरेशा आहेत. विनाकारण भविष्याची चिंता करत व सुंदर आयुष्याची स्वप्न रंगविण्यात फक्त वेळ वाया जातो. अनाठायी हव्यास हा मृगजळासारखा असतो त्याने कुणाचीच तृप्ती होत नाही.

        येणाऱ्या नवीन वर्षात आयुष्यावर भरभरून प्रेम करूयात. भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत आपुलकीचे चार शब्द बोलूयात. जगामध्ये कोणतीच व्यक्ती चांगली किंवा वाईट नसते फक्त आपण आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवूयात. आपण कुणावर प्रेम करतो त्यांचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा आपल्यावर असंख्य व्यक्ती मनापासून प्रेम करत असतात त्यांचा विचार करूयात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करूयात. मित्रांचे दुःख वाटून घेऊयात. त्यांच्या आनंदाचा परीघ वाढविण्यास मदत करूयात. आपल्या व इतरांच्या चुका माफ करायला शिकुयात. जगात आनंदी राहण्यासाठी असंख्य गोष्टी आहेत परंतु दुःखी होण्यासारखे कुठलेच कारण जगात नाही. लहान मुलांसारखे हसायला व खेळायला ज्याला जमेल तो नेहमीच उत्साही राहतो. अशाच उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत करूयात. सर्वांना नूतन वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा.💐


   
     


 -विजय ढोबळे (विजे)