Sunday, 31 December 2017

खान्देश जंक्शन @10 years , नारायण पेठ, पुणे


  खान्देशातील भुसावळ शहरात राहणारा मी. सुरुवाती पासूनच व्यवसाय करायचे स्वप्नं उराशी बाळगून होतो.. त्या स्वप्नपूर्तीसाठी मी थेट ऐतिहासिक आणि साहित्यिक वारसा लाभलेली पुण्यनगरी म्हणजे पुणे शहर गाठलं... स्वतःची अशी खाद्यसंस्कृती जपणारं हे शहर त्यात रस्तोरस्ती  हॉटेल्स आणि  खाद्यपदार्थांचे स्टाॅल्स... आणि अशा परिस्थितीत स्वतःच्या गावाची म्हणजे खान्देशाची चव पुणेकरांच्या जिभेवर रेंगाळत ठेवायची म्हणजे आव्हान होतं माझ्यासाठी.. पण आव्हान पेलायच ठरवलं सुरुवातीला मिळेल ती काम करत गेलो आणि मग छोटेखानी हॉटेल सुरु केलं... २००८ मध्ये मी खान्देश जंक्शन या नावाने खास खानदेशी चवं असलेलं जेवण देणारं हॉटेल सुरु केलं.... कमी तिखट आणि गोडधोड खाणाऱ्या पुणेकरांच्या पसंतीस तिखट खान्देशी जेवण उतरणं म्हणजे आव्हान होतं. माझ्यासाठी पण पुणेकरांच्या खवय्येगिरीवर तितकाच विश्वास होता आणि भरभरून दाद देण्याची वृत्ती हि माहित होती...
       सुरुवातीला अनेक अडचणी आल्या पण आत्मविश्वास आणि जिद्द मनात कायम होती... अडचणींवर मात करत शेतातल्या ताज्या भाज्या खास भूसावळवरून मागवून मी वांग्याचं भरीत, शेव भाजी, वरण बाफले(वरण बट्टी), पातोडी भाजी असे विविध प्रकार देण्यास चालू केले... खाद्यप्रेमींच्या पसंतीला हळू हळू खान्देशी चव पसंत पडू लागली आणि या व्यवसायात जम बसायला लागला... फेसबुक सारख्या सोशल मिडीयावर ओळख झालेल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरातील खवय्यांनी माझ्या हॉटेलला भेट दिली. इथले पदार्थ चाखले आणि भरभरून दाद दिली... आजही कोणी पुण्यात आलं की आवर्जून माझ्या या छोटेखानी हॉटेलला भेट देतात. 
खानदेशी
       मला सांगायला आनंद होतोय की, १ जानेवारी २०१८ ला माझे खान्देश जंक्शन हे हॉटेल ९ वर्ष पूर्ण करून १० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. पुण्यनगरीतील तसेच पुण्यातील खांदेशी मित्रांनी तसेच फेसबुकवरील महाराष्ट्रातील  माझा मित्र परिवार यांचे मी आभार मानतो कारण माझ्या स्वप्नपूर्तीस त्यांचा हातभार लागला आहे, ज्यांच्या पसंतीस खान्देशी पदार्थ उतरले आणि मला भरभरून पसंतीची पावती दिली.... ९  वर्षातील आपले हे प्रेम आणि स्नेह असाच वाढत राहो, आपल्या शुभेच्छा माझ्या पाठीशी कायम राहोत हिच आपणास विनंती....
नविन वर्ष आपणास सुखसमाधानाचे जावो आणि आपली भरभराट होवो हीच सदिच्छा...




- नीलेश चौधरी. (संचालक, खान्देश जंक्शन)

नवे वर्ष अपेक्षांचे की जबाबदारीचे.....??(अमोल अवचिते)


     "काळ कधीही कोणासाठी थांबत नसतो....तो एकतर आपल्या पुढे , नाहीतर सोबत असतो...". आज वर्षाचा शेवटचा दिवस, त्यामुळे प्रत्येक जण हा गतवर्षाचा आढावा घेण्याचा काही तरी प्रयत्न करणाच व पुढील वर्षाच्या इच्छा/अपेक्षा काय असणार याच एक गणित तयार करणार.  म्हणजे आपण एक विचार करू की एखाद्या स्त्रीला दिवस गेले की ,घरामधील प्रत्येक व्यक्तीला आनंद होतोच. तिच्या गर्भात निर्माण झालेला गर्भ हा मुलांचा असला पाहिजे अशी मानसिकता साहजिकच असते. कोणाला मुलगी हवी असते तर कोणाला मुलगा. जो नैसर्गिकरित्या गर्भ निर्माण झालाय त्याला न  भावना ,न संवेदना. मात्र त्याच्या कडून अपेक्षा की बाहेर येताना मुलगाच होऊन ये ..किंवा मुलगीच होऊन ये ....
          खरंच आपले आयुष्य हे पण, नव्याने या जगात प्रवेश करत असतानाच लोकांच्या अपेक्षांनीच  निर्माण झालेले असते. आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस कोणाच्या ना कोणाच्या अपेक्षावर चाललेले असते. रोज नविन येणारा दिवस कोणाच्या तरी मर्जीनेच जगायचा की  स्वतःच्या इच्छेने, आनंदाने??
     येणार नवं वर्ष हे इंग्रजी का असेना पण आपण त्याच्या स्वागताला सज्ज झालो आहोत. नवी  ध्येय ,नवी दिशा,नवी आकांक्षा,नवा उत्साह,नवा उपक्रम आणि नवा निश्चय हे सर्व घेऊन आपण नव्याने नव्या वर्षात प्रवेश करतोय....  येणार प्रत्येक दिवस आनंदानेच जगणार आहोत. नव्या वर्षाचा नवा दिवस आपल्यासाठीआनंदच घेऊन येणार आहे हे पक्क मनाशी ठरवून आपण त्या दिवसाला सामोरे जावूयात. रोजच काही तरी नवं शिकणार आहोत..नव्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. याच भान आपल्या हवंच .

      गेलेला प्रत्येक दिवस इतिहास जमा होतो.त्याच बरोबरीने भूतकाळात ही जमा होतोच. आता आपण नव्याने भविष्य काळाच्या दिशेने वाटचाल करणार आहोत. आता फक्त भूतकाळ हा आपला इतिहास केवळ आपल्या साठी अनुभव व एक धडा  म्हणून राहिला आहे, जो आयुष्यभरासाठी पुरणार आहे. नव्या आयुष्यात आपण भूतकाळाचा न भविष्याकाळाचा विचार करायचा , फक्त जगायचं ते वर्तमान काळातच, आपण हसतो ते फक्त आता, म्हणजे वर्तमान काळातच... २०१८ हे  येणारे नवे वर्ष आनंदाचे, चैतन्याचे, प्रेमाचे, भरभराटीचे व एक सुवर्ण संधीचे म्हणूनच राहील अशी अपेक्षा करुयात. सर्वांना नव वर्षांच्या मनापासून  हार्दिक शुभेच्छा!।।






-अमोल अवचिते.

Friday, 29 December 2017

'एमपीएससी-मित्र....' कार्यक्रमाचे आयोजन

स्पर्धा परिक्षेतील भावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतांना राजीव तांबे.

पुणे प्रतिनिधी:- "सकारात्मक विचारधारा ही माणसाच्या यशाची खरी सुरूवात असते. नेहमी मी हे करणारच असा भाव आपण ठेवला पाहिजे. तेव्हा आपण या स्पर्धेच्या जगात कायम पुढे असू. त्यामुळे नेहमी सकारात्मक रहा",असे मोलाचे मार्गदर्शन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते राजीव तांबे यांनी केले.
          'एमपीएससी-मित्र' ह्या नितीन प्रकाशन व पुणे मराठी ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या क्रायक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एमपीएससी परिक्षेमध्ये यशस्वी वाटचाल करणाऱ्या प्रथमेश घोलप आणि विवेक धांडे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.

विवेक धांडे यावेळी मार्गदर्शन करतांना
कार्यक्रमाचे अध्यक्ष तांबे यांनी यावेळी बोलतांना सांगितले, विद्यार्थ्यांनी आपले ध्येय योग्य ठेवली पाहिजे.आपल्या यशाची पद्धत आपण स्वतः शोधली पाहिजे. वाट आपोआप तयार होत असते. प्रत्येक गोष्टीला स्वीकारा, अडचणी नक्की येणार , पण त्यावर मात करने हे आपल्या हातात आहे. ह्या सर्व प्रवासात तुम्हाला नकारात्मक लोकही भेटतील, त्यांना एक 'स्माईल' दया, त्यांच्याशी कृतीतून बोला आणि आपल्या कामाला लागा. तांबे यांनी त्यांच्या आगळ्या-वेगळ्या शैलीतून विद्यार्थ्यांना  हसत खेळत अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.

Thursday, 28 December 2017

'लढेंगे जितेंगे....'(रशीद मनियार)


  •      "जीने मला   लढायला आणि बोलायला शिकवलं त्या छात्रभारतीचा कार्यकर्ता असल्याचा मला सार्थ अभिमान आहे ."  गेली ३५ वर्षे  छात्रभारती गोर-गरीब ,कष्टकरी विद्यार्थ्यांचा आवाज म्हणून महाराष्ट्रात काम करत आहे. विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांवर छात्रभारतीने लढा उभारला आहे आणि आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचा पवित्रा अगदी आक्रमक  पण संविधानाने दिलेल्या मार्गाने केलेला आहे. आजपर्यंत माझ्या सारख्या हजारों विद्यार्थ्याना जे काही संविधानिक बळ, स्थैर्य मिळाले ते फक्त आणि फक्त छात्रभारती मुळेच.
आज मी जो काही आहे, जे काही बोलतो ते फक्त छात्रभारतीमुळे. माझ्या विचाराची दिशा पक्की केली ती देखील छात्रभारतीने. आज कोणत्याही स्टेजवर आपला मुद्दा पटवून देतो तो छात्रभारतीच्या माध्यमातून होत असलेल्या अभ्यासमंडळांच्या साहाय्याने खऱ्या अर्थाने  मला विवेकशील  माणूस बनविण्याचे काम केले ते  छात्रभारतीने. छात्रभारतीने माझ्यावर इतके उपकार केले आहे की ते मी कधीच विसरू शकत नाही. नेतृत्व,वक्तृत्व आणि आपुलकी ही सारी कार्यपद्धती छात्रभारती कडून शिकलो,  महाराष्ट्रभर असलेले कार्यकर्ते जेव्हा आपुलकीने आणि तेवढ्याच काळजीने,पोटतिडकीने आपली विचारपूस करतात तेव्हा भरून पावल्यासारखं वाटतं. आज छात्रभारतीच्या माध्यमातून मी कोणाचा भाऊ,कोणाचा मुलगा ,कोणाचा मित्र झालो आहे. 
        अनेक लोकांशी रक्ताचे नाही पण त्याहून अधिक महत्वाचे नाते निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील असा एकही जिल्हा नाही जिथे माझ्या ओळखीचा एक कार्यकर्ता नाही, छात्रभारतीने खऱ्या अर्थाने नेतृत्व करण्याची संधी दिली. अनेक आंदोलने,मोर्च्यांमध्ये सहभागी झालो.अनेक गोष्टींविषयी माहिती मिळत गेली. खऱ्या अर्थाने माझ्यातला कार्यकर्ता जिवंत करण्याचं काम छात्रभारतीने केलं आहे.
        खऱ्या अर्थाने समतावादी बनवण्याचं काम छात्रभारतीने केलंय.शिक्षण,सहभाग,समता या त्रिसूत्री नुसार छात्रभारतीचं काम चालतं. १८ डिसेंबर २०१७ रोजी छात्रभारतीला स्थापन होऊन ३५ वर्षे होत आहेत. शिक्षणासाठी छात्रभारतीचा संघर्ष अविरतपणे चालू आहे. आजपर्यंत छात्रभारतीचा भाग झालेल्या सर्व जिंदादील कार्यकर्त्यांना माझा सलाम....!
"छात्रभारती की खास बात....लढाई पढाई साथ साथ"
लढेंगे जितेंगे. 
                                                       आपलाच साथी
                                                       रशीद मनियार .
                                                     (९६६५८५४३१५)

Sunday, 24 December 2017

'दिवस सुट्टीचा.....' (सविता शिंदे)

     सध्या धकाधकीच्या जीवनात गरजेच्या बऱ्याच कामांसाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे अशा कामांसाठी मिळतो तो सुट्टीचा दिवस म्हणजे अर्थातच 'रविवार'. याच दिवसावर आपण घरातील अनेक राहिलेली कामे ढकलतो. मात्र ठरविलेले एक असते आणि वेगळीच कामे करू लागतो. जसे की, कपाट आवरायला घेतल्यावर मधेच एखादा जुना अल्बम खुणावतो. टीव्हीवरील गाणे ऐकण्यात कसा वेळ जातो हे देखील समजत नाही. बघता बघता अर्धा दिवस कसा सरतो हेच कळत नाही. साहजिकच जेवणाच्यावेळी नाष्टा केला जातो. खाल्ल्यानंतर जरा निवांत पडावे वाटते आणि कामे तशीच पडून राहतात आणि मग चिडचिड सुरू होते.
          दरदिवस शरीराला धावपळीची सवय असल्यामुळे सुट्टी असलेल्या आनंदावर पाणी फिरते. पण दररोज धावपळ करणे हे काही जीवन नाही. खरंतर आपण सुट्टी उत्तमप्रकारे व्यतीत केलेली असते. त्यात काहीतरी नावीन्य असते. पण याकडे सरळ दुर्लक्ष करून उरलेल्या सुट्टीच्या आनंदात विरजण घालतो. याउलट त्यातून मनाला आनंद मिळाला. शरीराला थोडासा आराम मिळाला. एखाद्या दिवशी कामे वेळेच्या वेळी नाही झाली तर काय फरक पडतो? आपण माणसे आहोत यंत्र नाही. त्यामुळे फक्त काम आणि काम म्हणजेच जीवन नाही. आपल्या आवडत्या ठिकाणी फिरायला जाणे, आवडत्या व्यक्तींशी गप्पा मारणे, आवडत्या वस्तूंवर ताव मारणे. या गोष्टींनाही महत्व दिले तर निश्चितच आपले अनमोल जीवन जगण्याचा आनंद द्विगुणित होईल.

                                                -  सविता शिंदे .

'आगमन नव्यावर्षाचे......' (प्रसाद भणगे)



  "गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी " याप्रमाणे या वर्षाच्या सरतेशेवटी काही गोष्टी लक्षात ठेवण्या जोग्या नक्की असणार, तसे पहिले तर अनेक गोष्टींचे  साक्षीदार म्हणुन हे २०१७ वर्ष राहिले आहे. या वर्षाने ही आपल्याला बरेच से सुख-दुःख, यश-अपयश दिले असणार, काही लोक सोडून गेले असणार , तर नवीन काही लोक जोडले ही गेले असणार. प्रत्येक वर्षाप्रमाणे हे वर्ष देखील आपले ३६५ दिवसांचा कालखंड पूर्ण करून आपल्या सर्वांचा निरोप घ्यायचा तयारीत आहे आणि अशा वेळेस आता आपण उठून एका नव्या उमेदीने अणि उत्साहाने २०१८ च्या स्वागताच्या तयारीला लागले पाहिजे.

   या नव्या वर्षांसोबत आपण नवी ध्येये, नवी क्षितिजे गाठण्याची मोर्चेबांधणी करायला हवी. यश-अपयशाचा विचार न करता सकारात्मकते ने येणार्‍या प्रत्येक आव्हानाला आपण सामोरे गेले पाहिजे.

    जगातील अनेक मोठ्या गोष्टींची सुरूवात ही छोट्या-छोट्या गोष्टीच्या प्रयत्नांमधून झाली आहे, त्यामुळे आपणही आपल्या जीवनात अनेक गोष्टींची सुरूवात ही लहान-लहान ध्येयांमधुन करायला हवी. या सर्व प्रयत्नांमध्ये जीवनाकडे बघण्याची सकारात्मक दृष्टिकोन आपल्याकडे असला पाहिजे. आपले ध्येय गाठण्यासाठी  परिश्रम, योग्य मार्गदर्शन, सकारत्मक विचार व आत्मविश्वास यांच्या जोरावर आपण नक्कीच आपल्या कार्यात यशस्वी होऊ शकतो.

प्रसिद्ध व्याख्याते 'शिव खेरा' यांचे हे वाक्य कायम लक्षात राहण्याजोगे आहे. "जितने वाला कोई अलग काम नही करता, वो अपना काम अलग ढंग से करता है". तरी आपणा सर्वांना हे येणारे नवे वर्ष सुख समृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे व आरोग्यदायी जावो ही शुभेच्छा...!!







-प्रसाद भणगे, पुणे.

Monday, 18 December 2017

आज देशात सर्वत्र जल्लोष.... (निमित्त मात्र गुजरात निवडणूक निकालाचे)

        गुजरातमध्ये भाजप सत्तेत येईल? असाच कौल संपुर्ण एग्झिट पोलने दाखवल्याने संपुर्ण देशाचे लक्ष या निवडणूक निकालाकडे लागले आहे. या निकालाने भारतीय राजकारणाला एक वेगळे वळण लागणार आहे. दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची केल्याने नरेंद्र मोदी आणि राहूल गांधी या नेतृत्वाच्या राजकीय भविष्याची चिंताही वाढवणारी आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या या निवडणूक निकालाचे महत्व वाढले आहे.

        ज्या गुजरात मॉडेलच्या धरतीवर देशात भाजपाने 2014 साली स्पष्ट बहूमत मिळवून सरकार स्थापन केले. त्यानंतर इतर राज्यातही आपले पाय रोवले. त्याच गुजरात मॉडेलवर विरोधकांसह अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने भाजप अडचणीत आला होता. परंतु सर्वच एग्झिट पोलने भाजपच सत्ताधीश होणार असा अंदाज व्यक्त केल्याने भाजपच्या कोमजलेल्या आशा पल्लवित झाल्या. तर काँग्रेस पक्ष सत्तेच्या जवळ जाईल असा अंदाज पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानानंतर याच एग्झिट पोलने काढले होते. पण दुसऱ्या टप्प्यातील एग्झिट पोलच्या अंदाजाने हे सगळे अंदाज बदलले. त्यामुळे काँग्रेसच्या नवसर्जनाची उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे. त्यातच हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवाणी या तीन त्रिकूटाचा फायदा कोणाला होईल. याचीही चर्चा होताना दिसते.

        ज्या त्रिकूटांनी गुजरातमध्ये भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण केले. त्या तरुण नेतृत्वाला लोक आपलसं करतात का? हा खरा प्रश्न आहे. जर असे झाले तर त्याचा फायदा काँग्रेसला होणार की, मत विभाजनाचा फटका बसेल? विशेष म्हणजे गुजरातमध्ये भाजप विरोधी वातावरण निर्माण होण्यास सत्ताधारी पक्षाची नाराजी, नेतृत्वांतर्गत वाद, दलितांवर अत्याचार आणि पाटीदार आंदोलन इत्यादी घटना ह्या कारणीभूत होत्या. त्यामुळे परिस्थिती बदलण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याच भूमीत 50 सभांचा चंग बांधला व गुजराती लोकांना आपलसं करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. तर त्याच पद्धतीने विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल करीत भाजपची चांगली दमछाक केली. परंतु कोणत्याही पक्षांनी मुलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका घेतली नाही. तर ज्या गुजरात मॉडेलवर हे सगळ घडलं त्या गुजरात मॉडेलची चर्चा सुद्धा या निवडणुकीत कुठेही प्रक्रर्षाने झाली नाही. भाजपने यावर चर्चा करुन आपला वेळ खर्च केला नाही. तर विरोधकांनी याकडे साफ दुर्लक्ष केल्याने विकासाच्या मॉडेलची चर्चा होण्याऐवजी व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपाच्या चर्चा भाजप व काँग्रेस पक्षांच्या नेत्यांकडून झाल्या. त्यामुळेच ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहूल गांधी यांच्या श्रेष्ठत्वाची झाली आहे.

  मोदींनी "सबका साथ सबका विकास" या मुद्द्यावर निवडणूक प्रचार करत, गुजराती अस्मिता, हिंदूत्व यासारखे मुद्दे निवडणुकीच्या केंद्रस्थानी आणले. तर राहूल गांधींनी नोटाबंदी, जीएसटी, जातीय राजकारण आणि मोदी व केंद्रसरकारवर आरोप करत निवडणूक प्रचार केला. याचा कुणाला किती फायदा होईल हे कळेलच...पण निवडणुकीचा प्रचार मात्र व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपाच्या पातळीवर येऊन पोहचला होता. असे असले तरीही या निवडणुकीत काँग्रेसने जातीय समीकरणे मांडून भाजपाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तर भाजपाने काँग्रेसवरच पलटवार करीत आपल्या हिंदूत्वाच्या मुळ अजेंड्याकडे लोकांचे लक्ष वळवले. आणि काँग्रेसचा वाढता प्रभाव जाणीवपुर्वक कमी करण्याचा प्रयत्न केला. असे असले तरीही जातीय समीकरणाचा प्रभाव हा व्होट बँक म्हणून एकत्र आल्यास हे चित्र काहीसे वेगळे दिसेल. तसेच आदिवासी व शहरी भागातील मते ही भाजपाला आपल्याकडे वळवण्यात किती यश येईल व ग्रामीण मतदार कोणाच्या झोळीत आपली मते टाकेल? या सगळ्यावर खरे तर काँग्रेस व भाजपच्या जागांचे गणित ठरेल...

        या निवडणुकीतला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे बुथ मॅनेजमेन्ट होय. गुजरातमध्ये भाजपाची सत्ता आल्यास याचे सर्व श्रेय हे भाजपाच्या कार्यकर्त्यांना व बुथ मॅनेजमेन्ट करणाऱ्यांना द्यावे लागेल. कारण गुजरातमध्ये सत्ताधारी पक्षाकडे कार्यकर्त्यांची मोठी यंत्रणा सक्रिय आहे. हे कार्यकर्ते नुसते सक्रिय आहेत असे नाही तर ही निवडणूक भाजपाने जिंकली पाहिजे यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार त्यांचे नियोजन केले आहे. त्यासाठी पेज प्रमुख, बुथ प्रमुख व बुथ विस्तारक आणि इतर कार्यकर्ते असे सुत्रबद्ध पद्धतीने निवडणुकीचे व्यवस्थापन केले आहे. तर याबाबतीत काँग्रेस कमकूवत आहे. काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची संख्या कमी आहे. त्याचे संघटन नाही. आणि त्यांच्याकडे विशेष अशी यंत्रणाही उपलब्ध नाही. याबरोबरच पक्षाअंतर्गत मतभेद असल्याने त्यांच्यात गट-तट अधिक आहेत. या परिस्थितीचा अंदाज घेऊन राहूल गांधी यांनी निवडणुकीची सर्व जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे. पण ते त्यात किती यशस्वी होतात. हे निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच कळेल. पण बुथ मॅनेजमेन्टकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कारण निवडणूक व्यवस्थापन हा घटक सुद्धा आधुनिक काळात लोकशाहीत महत्वाचा मानला जातो. असे असले तरीही व्यावसायिक असणारा गुजराती समाज कोणाच्या हाती सत्तेची सुत्रे देतो यावरही बरेच काही अवलंबून आहे. त्यामुळे या निवडणूक निकालाची प्रतिक्षा आता शिगेला पोहचली आहे. बघूया........? गुजराती मतदार कुणाच्या हाती राज्याचा कारभार सोपवणार…..?

                                             



                       
                                                  - गंगाधर बनसोडे

Monday, 27 November 2017

#चिल्लर_जिंदगी...(सुमित ढिवरे,एल.एस रहेजा महाविद्यालय,मुंबई)


   एक १०चा कॉइन
आणि २ रुपये सुट्टे..
स्टेशन पर्यंत पोहचवतील येवढेच काय ते शिल्लक पैसे घेउन मी रागा रागात रिक्षा स्टॉपच्या दिशेने निघालो होतो.
मीटर चे ४७ रुपये झाल्यावर whatsapp  मेसेजला रेप्लाय देतांना ५० ची नोट त्याच्या हातात टेकवल्यावर तो रिक्षावाला ३ रूपये चेंज द्यायचा तेव्हा 
' रैहने दो भैया" असे ज्या ज्या वेळेस बोलो होतो ती प्रत्येक 'माजोडी ' आठवण अजून डोळ्या समोरून जातच नव्हती...
रिक्षेतून उतरल्यावर सिंग्नल क्रॉस करतांना मला पूर्वी कधीच न दिसलेले ते खादाड लोकं आणि ते खाऊचे स्टॉल  जमिनीतून प्रकट झाल्यासारखे आज अचानक माझ्या समोर उभे राहिले होते.
समोर येणारा प्रत्येक चेहरा श्रीमंत दिसत होता खिसे भरलेल्या गर्दी सोबत मी आठ मिनिटे चालून कसा तरी प्लॅटफॉर्म पर्यंत पोहचलो.
जपून पावले टाकत टाकत दुर पर्यंत माझी नजर TC कुठे दिसतोय का ते शोधत होती. without ticket जाण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लकच नव्हता.चिड-चिड ,संताप आणि डोक्याचा नुसता भुगा होत होता...
CST ट्रेन मध्ये  बसलो सीटवर बसल्या बसल्या आधीची गाडी ही नव्हती हे माहीत असतांना सुध्दा आजूबाजूला काही 'काळ्या' रंगाच दिसतय का..??
म्हणून शोध सुरु झाला..
माझ्या केविलवाण्या हालचाली बघून,काहीच माहित नसतांना सुद्धा समोर बसलेला पंचेचाळीसीतला काका खाली वाकून माझ काही हरवलंय म्हणून तो पण शोधू लागला..
आता त्याला कोण सांगणार काही तासांपूर्वी CST वरुन येतांनाच "माझं काळ्या रंगाच पाकीट हरवलं होत..."
घोळक्यात किंवा एकटे मिरतांना,छोटी वा मोठी चड्डी किंवा नागडे असतांना सुद्धा ढुंगनाला हात लावताच ज्याचा आधार वाटायचा ते पाकीट 'आधार कार्डा' सोबत मला कायम साठी सोडून गेले होते....
फोन दोनदा vaibrate झाला.. "आता माझ्या जवळ फक्त ५०० आहेत" माझे पाकीट हरवले हे समजल्यावर मला बळजबरी पैसे घेण्यासाठी बोलवलेल्या त्या जिवलग मैत्रीणीचा मेसेज वाचून रिप्लाय न करताच फोन लॉक  केला..
घाटकोपर गेल्यानंतर मागच्या बाजूला गाण्याचा आवाज येत होता.ते नेहमीचेच पैसे मांगणारे भिकारी म्हणून दुर्लक्ष करण्यासाठी मी माझ्या डोक्यात धावणाऱ्या विचारांसोबत खिडकीच्या बाहेर बघत होतो.दोन्ही पाय नसलेली एक लहान मुलगी सरकत सरकत केव्हाच माझ्या पाया जवळ आली होती.
दरवाज्या जवळ असलेल्या, बोगीतल्या दांड्या जवळ उभी राहून तान्ह बाळ हातात घेउन तिची मोठी बहीण एका फळीवर ठेकाधरुन साईबाबाचे गाणे बेसुरात गात होती, त्या समोरच्या काकांनी माझ्या पाया जवळ आलेल्या त्या चिमुरडीच्या हातात पाच रुपये ठेवले. माझ्या दिशेने वळत एका हाताने, माझा पाय हलवत दुसरा हात तिने पुढे केला.. माझ्या कडे नेमकी बोलायला आणि द्याला काहीच नव्हते.
मी फक्त तिच्या डोळ्यांत बघत आतल्या आत फुटफुटलो...
"आज  खरचं काहीच नाही देण्यासाठी...."
दोन सेकंद तशीच माझ्याकडे बघत नंतर पुढे पुढे सरकत ती दिसेनाशी झाली....
मोबाईल पुन्हा vaibrate झाला...

" मला १०-१५ मिनिटे उशीर होणार..
मीटिंग मध्ये आहे...सॉरी"
कोणतेही बाहुले add न करता मी तीला रिप्लाय केला.
"...ओके..."
डोक्यातली चिड चिड.... माझ्या कडे विनाकारण बघणारा समोर बसलेला काका आणि हात पुढे करुन "डोळ्यांनीच" पैसे मागणारी ती मुलगी, पुढे जाणाऱ्या ट्रेन पेक्षा वेगाने डोक्यात विचार धावत होते, खिडकीच्या बाहेर झप झप जाणाऱ्या आकृत्यां कडे बघत, मी डोक्यात उडालेल्या गोंधळाला वाट दाखवण्याचा निष्फल प्रयत्न  करत होतो...
CST  येइपर्यंत  केव्हाच पाऊस सुरु झाला होता...
मी without ticket सुखरूप स्टेशन च्या बाहेर पडलो. आमच्या नेहमीच्याच  जागेवर भींतीचा आडोसा घेऊन पावसाचा आवाज ऐकत मैत्रिणीची वाट बघत उभा होतो.रस्त्याच्या कडेला ताडपत्रीने बांधलेले घर पावसापासून वाचवण्यासाठी दोघे माय लेकं आरडाओरडा करून दोरी बांधत होते..
२-३ मुलं सिगारेट फुकत उभे होते.एक जोडप ओठाला ओठ लावण्याच्या बेतात बिलगद होत. कुडकुडनारा एक कुत्रा  बसण्याची जागा शोधण्यासाठी तिथेच गोल गोल घुटमळत होता.
खिशात पैसे नसतांना फ्री मध्ये ऐकायला मिळणारा पावसाचा आवाज,मी हाफाफल्या सारखा डोळे बंद करून कानात जीरवत होतो..
छत्री बंद करण्याच्या आवाजा सोबतच तिने मागून मला डोक्यावर टपली मारली..
"मूर्ख आहेस तु पाकीट कसं  हरवलस..? हे घे आधी.."
अस बोलून माझ्या हातात ५०० चि नोट आणि ATM card कोंबले.
मी काही बोलण्याच्या आत माझा हात पकडून ती मला पुढे घेउन जात होती...
"हे office वाले पण ना  साले...किती वेळ केला ...आज पप्पाचा बर्थडे आहे....माहित होत तरी पण ना.."
एकाच दमात ती सर्वच सांगण्याचा प्रयत्न करत होती.
धावत धावत आम्ही प्लॅटफॉर्म १ वर पोहचलो .
शेवटचाच लेडीज ड्ब्बा पकडून ती आत शिरली.
लगेचच मोठा भोंग्याचा आवाज  करुन तीची ट्रेन निघाली..
इशाऱ्यानेच कॉल करते असे सांगुन ती bye bye करत होती...
धावल्या मुळे फुललेला श्वास..विनाकारण चेहऱ्यावर आलेले हसू, "पिन कोड" माहीत नसलेले ATM कार्ड आणि ५०० रुपये हातात तसेच  पकडून मी मागे वळलो...
तोच समोर उभा असलेल्या काळ्या पांढऱ्या ड्रेस मधल्या TC ने एक हात पुढे करत माझ्या दोन्ही डोळ्यात बघत विचारले..
तिकिट...??


- सुमित ढिवरे.
(लेखक हे एल एस  रहेजा चे माजी विध्यार्थी असून सध्या मुंबई येथे चित्रपट क्षेत्रात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून  काम पाहतात.)
ईमेल id- divresumit@gmail.com 

Saturday, 25 November 2017

विचारांचे सीमोल्लंघन.....(टीम वृत्तवेध)





            '' जगामध्ये कोणतीही नैतिक मूल्ये केवळ चांगली आहेत म्हणून टिकत नाहीत, तर त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या पाठीमागे सामर्थ्याचे पाठबळ असणे आवश्यक असते '' असे एका तत्ववेत्याने फार पूर्वी म्हंटले होते . आज एका बलाढ्य वैचारिक सामर्थ्याची खरोखरच गरज भासत आहे, कारण जे विचार करताहेत त्यांच्या मात्र हत्या केल्या जात आहे. 
एकीकडे न्यायालय अनेक प्रकारचे स्वातंत्र्य देत आहे, पण वैचारिक भूमिका मांडण्याच्या स्वातंत्र्यास मात्र समाजकंटक विरोध दर्शवित आहे. तेवढी आपण नावापुरती लोकशाहीची मूल्ये स्वीकारली , पण आचरणात आणली नाहीत . सध्याच्या आभासी जगातून बाहेर येण्यासाठी जगण्याला वास्तवतेची जोड द्यावी लागणार आहे. 

आज समाजात वैचारिक विषमता फार टोकाला भिडलेली दिसत आहे.विचारवंतांच्या दुष्काळ व अविचारी लोकांचा सुळसुळाट हेच या जगाचे खरे दुर्दैव झाले आहे . आज या देशात  कोणाला ऑक्सिजन  मिळत नाही म्हणून जीव सोडावा लागत आहे , तर काहीजण पशूला वाचवण्यासाठी जिवंत  माणसांची हत्या करीत आहे. 

११ व्या शतकात ज्ञानेश्वरांनी '' विश्वाचे आर्त  माझ्या मनी  प्रकटले .... '' असे म्हंटले होते. या ज्ञानेश्वरांना समाजाने तितकाच त्रास दिला . सत्वशील विचारांची गंगा समाजापर्यंत पोहचवत मूढांना सुज्ञ करण्याचा जगतगुरु तुकारामांना समाजाकडून हाच त्रास झाला होता. आपण कोण आहोत ? कशासाठी आलोय ? आणि आयुष्याला आपण काय परत देणार ? या प्रश्नांचा  एकदा सारासार विचार केल्यास मानवी जीवन पोहचेल. यासाठी सर्वांच्या विचारांच्या सीमोल्लंघन व्हावे, हीच अपेक्षा करूयात . 



-टीम वृत्तवेध

सागरिका घोष यांच्या नव्या पुस्तकाच्या घेतलेला हा संक्षिप्त आढावा


इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाचा  आढावा सागरिका घोष  या  पत्रकारितेमध्ये प्रत्यक्षात काम केलेल्या स्तंभलेखिकेने  आपल्या  या नव्या पुस्तकामध्ये मांडला  आहे. बालपणापासून घरातील उच्च प्रशासकीय पार्श्वभूमी लाभल्यामुळे त्यांना या क्षेत्राची जाण  ही  आधीपासूनच आहे हे त्यांचे साहित्य वाचल्यावर लगेच समजते. त्यांचे विश्लेषण , अभ्यास, व्यासंग  हे  त्यापासून तयार होत गेले. अजूनही त्या सामान्य वाचकाला समजेल अस  लिखाण नियमीतपणे करत असतात. तर जाणून घेउयात नेमके  कोणते पैल्लू त्यांनी इंदिराजींचे "इंदिरा: इंडियास मोस्ट पॉवरफुल प्राईम मिनिस्टर " या पुस्तकामध्ये  मांडले आहेत ते...   


     १९६३ साली डोरोथी नॉर्मनला लिहिलेल्या पत्रात इंदिराजी म्हणतात, इथला राजकीय कोलाहल मला असह्य होतो. असं वाटतं , दूर इंग्लंडमध्ये एखाद्या छोट्याश्या घरात कायमचं स्थायिक व्हावं . याच इंदिराजी १९७७ च्या पराभवानंतर , पुन्हा रायबरेलीत येतात. उघड्या जीपमधून एखाद्या नायिकेसारख्या रोड शो करतात आणि हजारोंच्या जमावापुढे विरोधकांना जणू सांगतात, "मी पळून गेले नाहीये. मी इथेच आहे आणि मी लढणार आहे." हा कमालीचा विरोधाभास हे इंदिराजींच्या वैयक्तिक आयुष्याचं , त्यांच्या राजकीय निर्णयांचं,त्यांच्या आर्थिक धोरणांचं आणि त्यांच्या वादळी कारकिर्दीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. सागरिका घोष यांनी लिहिलेलं "इंदिरा: इंडियास मोस्ट पॉवरफुल प्राईम मिनिस्टर " हे व्यक्तिचित्र वाचताना हे पानोपानी जाणवत राहतं .
नेहरूंच्या  कुटुंबात आपल्या आईची होणारी घुसमट आणि एकटेपणा पाहून आलेली अलिप्तता, वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करताना आलेलं अपयश या सगळ्यातून ऐन उमेदीच्या वर्षांत एक बंडखोर, स्वतंत्र आणि महत्तवाकांक्षी इंदिरा घडत होती.
नेहरूंनी राजकीय वारसदार म्हणून त्यांना घडवलं नाही पण
राजकीय धामधुमीपासून आणि सत्तेच्या प्रभावापासून इंदिराजी कधीच दूर राहू शकल्या नाहीत. सत्ता आणि त्यातून येणारं निरंकुश सामर्थ्य हे त्यांच्यासाठी टॉनिक होतं त्यांनी वेळोवेळी नाकारलं असलं तरीही . पुस्तक वाचताना हे अधिकच स्पष्ट होतं .
एकाधिकारशाही , धक्कातंत्र यातून घेतलेल्या त्यांच्या काहि निर्णयांनी विरोधकांना निष्प्रभ केलं , लोकशाही संस्थांना कमकुवत केलं , आणि पक्षाला घराणेशाहीचं बटीक केलं .

 आर्थिक  धोरणांबद्दल कमालीचं गोंधळलेपण आणि एकवाक्यतेचा अभाव यामुळे गरिबी हटाव फक्त एक घोषणा होऊन बसली.
त्याचवेळेस त्यांचा लढवय्येपणा दिसतो तो बांग्लादेशच्या मुक्तिसंग्रामात, मिझोरामच्या सामिलीकरणात आणि ऑपरेशन ब्लुस्टार मध्ये. त्यांचा राष्ट्रवाद दिसतो तो निक्सानपुढे न झुकण्यात आणि अणुचाचणीच्या यशस्वीतेत.
एकाच वेळेला
इंदिराजी म्हणूनच मग विरोधाभासाचं एक आगळं रसायन होऊन बसतात. इंदिरा गांधी एक व्यक्ती न राहता ती प्रवृत्ती बनून जाते. लोकशाहीचा जप करत हुकूमशाही लादणारी , राजेशाही बंद करणारी पण पक्षांतर्गत राजेशाही जोपासणारी, कमालीचं प्रेम आणि पराकोटीचा द्वेष या दोन्हीची सारखीच धनी होणारी. इंदिराजींच्या व्यक्तिमत्वामागच्या या प्रवृत्तीला समजून घेण्यासाठी तरी नक्कीच हे पुस्तक वाचलं पाहिजे.

अभिषेक राऊत .( लेखक हे संगणक अभियंता असून सध्या रानडे संस्थेचे विद्यार्थी आहेत.)

Friday, 24 November 2017

बुलेट ट्रेन बाबत.....(प्रसाद भणगे यांनी घेतलेला आढावा)

जपानच्या अध्यक्षासमवेत बुलेट ट्रेन प्रकल्प कार्यान्वित करतांना

विकास विकास  म्हणता  आज आपल्या देशात  बुलेट ट्रेन  नीव आखली गेली, खरं  तर बुलेट ट्रेन ही  खूप  फायदा  करून देणारी असली तरी त्याने विकासाची गंगा ही काही वाहणार नाही आहे.   . कारण या देशात एकी कडे उत्तर प्रदेश  सारख्या राज्यात शेकडो बालक ऑक्सिजन च्या असुविधेमुळे  मृत्युमुखी पडताय, पूर्ण देशात आज कच्चा तेलाचा भाव 50 रुपये/byarel असताना ही पेट्रोल डिझेल चे भाव हे गगनाला भिडले आहेत. तिकडे आपला विकास दर GDP हा उतरत  चालला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं  म्हणजे भारतीय बाजार पेठ जी  जगातील  मोठी बाजार पेठ म्हणून नावारुपाला येत आहे.  ती पण  आज कुठेतरी मंदावली आहे. मग एवढे  सगळे  दिसत असतांना  जर आपल्या वाट्याला  विकासाच्या नावाखाली जर बुलेट ट्रेन येत असेल तर ती  खरंच फायद्याची आहे का  हे आपण एकदा सचोटीने  पडताळून पहायला हवे.  
खरं  तर सामान्य माणसाची विकासाची  व्याख्या ही खूप सोपी असते, ती म्हणजे पेट्रोल,डिझेल आणि भाजी-पाला ह्या गोष्टी रास्त दरात उपलब्ध होणे अणि शेतकर्‍यांच्या मालाला चांगला भाव मिळणे येवढच आह़े.


 तसा माझा काही बुलेट ट्रेन ला विरोध आहे अस नाही अणि बुलेट ट्रेन मुळे  रोजगाराची निर्मिती होईल हे ही मला पटतय. 
अर्थातच बुलेट ट्रेन मुळे   बाकी देशांच्या आपला देशाकडे पहायचा दृष्टीकोन ही बदलेल. या देशात विकासाचे वारे अजून वेगाने वाहू लागतील हे ही तितकाच सत्य आहे  आणि आपल्या कर्तबगार पंतप्रधानच्या परराष्ट्रीय धोरणामुळे अणि सर्वाराष्ट्रांशी  शांती पूर्वसंबंधांमुळे  हा देश सुजलाम सुफलाम झाल्या शिवाय राहणार नाही हे ही मी या ठिकाणी नमूद करू  इच्छितो. 
 विकसनशील देशात असे  प्रकल्प उभे राहणे ही  विकासाला पुरक असणारी बाजू आहे, पण अशा  प्रकल्पांसाठी लागणारी भारतीय शेत जमीनीचे संपादन होणार असेल तर हे असे प्रकल्प ही विकासाला तारक ठरतील की मारक ठरतील हे ही आपण बघायला हवे . आज देशाची  ओळख जरी औद्योगिकदृष्ट्या प्रगत   राष्ट्राकडे जात असले तरी ह्या देशाची खरे  मुळ हे  शेतीच आहे हे आपण कधीही विसरता कामा नये. ह्या कृषी प्रधान ओळख असलेल्या  देशात भारतीय शेती  ही उद्ध्वस्त होणार नाही अणि बळीराजा ही हतबल होणार नाही ह्याची काळजी प्रामुख्याने जर येथील राज्यकर्त्यांनी  घेतली तर ह्या "बुलेट सुसाट विकासाला" सर्व सामान्यांचा आणि बळीराजा चा  ही पाठींबा असल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधान मोदींच्या ह्या बुलेट स्वप्नाला माझ्या शुभेच्छा !!
-प्रसाद भणगे . BE E&TC

Thursday, 23 November 2017

वर्दीतील खरे रूप आता...(वाचा सांगली हत्याकांडा बाबत)

सदरक्षणाय खलनिग्रहणाय.....की उलट अशी स्थिती होतेय आज?
सध्या सांगली पोलिसांची 'कौर्य'कथा खुपच चर्चेत आली आहे आणि ती चर्चा करणे ही तितकेच गरजेचे सुद्धा आहे. कारण यामुळे आपण अंगावर वर्दी घातली म्हणजे काहीही बेधडकपणे करू शकतो हे आजच्या वर्ग-३ पासून ते वरच्या वर्गापर्यंत बहुतेकांना वाटत आहे.
          जेव्हा समाजाला असुरक्षितता वाटते  तेव्हा ती असुरक्षितता दूर करण्याचे काम शासकीय नियमांनुसार प्रथमतः पोलिसांचे असते मग बाकीच्या यंत्रणा असतात. परंतु आता हे चित्र पूर्णपणेच बदलले दिसतेय. कारण आजच्या समाजाला ह्या लोकांच्या 'तडजोडीची' भीती ही अधिक वाटत असते. कारण जशी दरोडेखोराची जात असते तशीच काही ह्या तडजोड करण्याऱ्या लोकांची असते. जर का कोणाचा या जगात यासंबंधी 'वाली' नसेल तर मग त्या संबंधिताला किती मरण यातना सहन कराव्या लागत असतील ते देवच जाणे. कारण हे गणित सर्व पैस्यावर अवलंबून असते.मग फार तर फार पुढे हे गणित आजच्या भाषेत दूसरी तडजोडी म्हणजे शारीरिक असते. पण जास्त करुण पैसा हा मोठा ठरत असतो.
      साधे उदाहरण घ्यायच म्हंटले की आपण वाहतूक पोलिसांचे घेऊयात. ह्या लोकांच जास्त लक्ष हे वाहतूक नियमनावर नसून ते दंडात्मक (म्हणजेच तडजोडीची)  कारवाईवर जास्त असते. वाहतूक नियमनाचे मुळचे काम सोडून ही पोलीसं दररोज अनेक लोकांना या तडजोडीला सामोरे जाण्यास भाग पाडतात.
       हे सर्व सांगण्याचा उद्देश् एकच होता की महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून ही वर्दीतील मुघलाई चालू आहे.तुरुंगातील मंजूळा शेट्ये प्रकरण शांत होत नाही तो पर्यन्त हे सांगलीचे प्रकरण समोर आले. अनिकेत कोथळे ह्या मुलाच्या बाबतीत हेच घडले. पोलिसांच्या ह्या क्रूरपणामुळे गेल्या दोन महिन्यात ही दोन बळी गेलेत. कुठतरी वैयक्तिक हेव्यादाव्या पोटी त्याला अटक करुन लवकरात लवकर न्यायालयीन कामकाज ओळखीच्याच वकीलामार्फ़त उरकूण पोलिस कोठडी मिळऊन घेतली. कारण यामध्ये आरोपीस योग्य ती 'ट्रीटमेंट' देता येते.  जेवढी रक्कम ( तडजोडीची ) बाहेरून मिळालेली असते , तेवढा राग मग यामध्ये काढला जातो. परंतु येथे तर कौर्याची परिसीमा झाली किरकोळ गुह्यांतील आरोपीला थर्ड डिग्री देतांना त्यांच्या जीवण-मरणाच्या विचार न करता त्याला बेदम मारण्यात आले आणि त्यात कोथळे चा मृत्यु झाला.पण येथे यांचे शौर्य(कौर्य) थांबले नाही.. ह्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तो मृतदेह मोठ्या हिमतीने (उपस्थित पोलीसांशी संगतमत करूण) पोलीस स्टेशनच्या बाहेर नेऊन एका दुरच्या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न केला.
         येथे प्रश्न निर्माण होतो की हे सर्व धाडस निर्माण कस काय होत असेल.असे कोणते घटक असतात की माणसाला इतके क्रूर रानटी पशु सारखे वागायला वा कृती करायला भाग पाडत असतील. तर अनेक वर्ष ही लोक त्याच ठिकाणी ठाण मांडून बसलेली असतात.यातून अनेक आर्थिक संबंध हे तयार झालेले असतात...त्यात वैयक्तिक लागेबांधे.......राजकीय पाठबल...स्वतःचा खोटा रुबाब...आपण म्हणजेच सर्वकाही ही वृत्ती...नव्या जगातील 'सिंघम' प्रतिमा..त्यात वर्दी...प्रतिमेचा दुरुपयोग....समांतर पोलीस ठाणे...असे अनेक कारणे यामध्ये आहेत.मग येथूनच कुठून तरी ह्या वृत्तीचा उगम होतो आणि मग पदाची ,स्वतःच्या अधिकारांची नैतिकता विसरून युवराज कामटे सारखे अधिकारी पुढे येतात आणि असले कौर्य करुण बसतात. ही खूप भयान आणि मन विषण्ण करणारी गोष्ट आहे. या मध्ये नुसताच दोष काही समोर असलेल्या लोकांचा नाही आहे तर यांची सर्व कारनामे माहित असून त्यांना सहाय्य करणाऱ्यांचा सुद्धा आहे. सध्या तर शिस्तप्रिय असे पोलीस अधिकारी उच्च स्तरावर तेथे आहेत. समाजात त्यांची नुसतीच भाषणे आनंदाने ऐकली जातात. ह्या अधिकाऱ्यांनी समाजाला मार्गदर्शन बंद करुन जर स्वतःच्या विभागापूर्ता जरी विचार करुन ह्या चांगल्या गोष्टींचा अंमल केला तरी खूप उपकार होतील. आज ह्या घटनेमुळे संपूर्ण पोलिस खात्याला जबाबदार नक्कीच धरता येणार नाही,परंतु काल मुंबई ,आज सांगली आणि अजून उद्या काही.....! मग हीच शृंखला चालू ठेवायची का ? हे गृह खात्यानेच ठरवावे.... कारण 'वर्दी'तील खरे रूप आता बाहेर येत आहे....



- अमित येवले.
BE (Electrical)
master's in Public Administration

श्रीपाद जोशी लिखित 'हवी तशी नक्षी' पुस्तक प्रकाशन....

श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला


पुणे प्रतिनिधी - ' हे पुस्तक वाचतांना मी स्वतः नापास झालोस, फार गुंतागुंतीचे असे महाकाव्य स्वरूपाचे लेखन करण्यात आले आहे. अनुभूति व अभिव्यक्ती यांची सांगड घालणारे हे लेखन जीवनातील अनेक प्रश्न सोडविन्यास मदत ठरू शकते . जोशी हे सामान्य व्यक्ती आहेत पण त्यांची सामाजिक तळमळ, ऊर्मी ही असामान्यतेला शोभणारी आहे.' असे ज्येष्ठ समीक्षक श्रीपाल सबनीस यांनी पुस्तक प्रकाशनाच्या वेळी सांगितले.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा व दिलीपराज प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने
श्रीपाद भालचंद्र जोशी लिखित 'हवी तशी नक्षी' पुस्तक प्रकाशन सोहळा ज्येष्ठ समीक्षक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. अश्विनी घोंगडे या उपस्थित होत्या.

 या प्रसंगी अश्विनी धोंगडे म्हणाल्या, 'हे पुस्तक वाचल्यानंतर विचार करण्याला लावेल असेच आहे. ललीतबंधच्या ऐवजी हे पुस्तक 'नाट्यमय स्वगत' अशा स्वरूपात मोडेल असे आहे. या संपूर्ण पुस्तकात एकोणवीस स्वगत आहेत. नक्षी ही एक कला आहे त्यामुळे खरंच मनाला हवी तशी विचारांची नक्षी या मध्ये मांडली आहे.

श्रीपाद जोशी या प्रसंगी म्हणाले, 'आज समाजात कोणी शीर मागतोय तर कोणी गळा मागतोय. पण हे सोडून समाजात बुद्धि वा मेंदू मागण्याची हिम्मत कोणी करत नाही. ही सध्याची शोकांतिका आहे.३० वर्षांपासून माध्यमांनी केलेली लोकांच्या केलेल्या बुद्धिबेदाची प्रेरणा या पुस्तकाच्या मागे आहे. विचारातून विचार आणि  प्रश्नांतुन प्रश्न जोपर्यंत निर्माण होत नाही, तो पर्यंत आयुष्य सुंदर होऊ शकत नाही. मी याच प्रश्नांचा शोध या माझ्या लेखनातून घेण्याचा प्रयत्न केला आहे.'

 या प्रसंगी दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे ,उद्धव कानडे, सचिन इटकर , संतोष शेणई आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन इटकर यांनी केले तर सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.